*हुतात्मा बाबू गेनू जन्मदिन*
जन्म - १ जानेवारी १९०८ (आंबेगाव,पुणे)
स्मृती - १२ डिसेंबर १९३० (मुंबई)
हुतात्मा बाबू गेनू यांचा जन्म महाळुंगे, ता.आंबेगाव, जि.पुणे येथे झाला. स्वातंत्र्यांच्या या चळवळीत अनेकांनी प्राणांची आहुती दिली. मुंबईत परदेशी मालाला विरोध करणारे बाबू गेनू हे असेच एक नाव. बाबू गेनूंचे नाव सध्याच्या तरुण पिढीच्या लक्षात नसेलही. बाबू गेनू यांचे पूर्ण नाव बाबूराव गेनू असे होते. त्यांचे नोकरी निमित्त मुंबई येथे वास्तव्य होते. मुंबईच्या फिनिक्स मिल मध्ये बाबू कामाला होते. मुंबई येथे गिरणीत कामाला असून त्यांच्या मनात स्वातंत्र्याचा ध्यास होता. १९३० साली वडाळा येथे झालेल्या सत्याग्रहात त्यांना सक्तमजुरीची शिक्षा झाली. पुढे शिक्षा भोगून परतताच मुंबईत विदेशी कपड्याच्या बंदीची चळवळीत ते सक्रीय झाले. त्यांचे लौकीक अर्थाने फारसे शिक्षण झालेले नसले तरी देशप्रेमाची मशाल मात्र त्यांच्या मनात सतत धगधगत होती. १९३० साली महात्मा गांधींनी सुरू केलेल्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीत त्यांनी भाग घेतला होता. मुंबईत परदेशी मालाची विक्री करणाऱ्यांची दुकाने बंद करण्यामध्ये त्यांनी पुढाकार घेतला होता. १२ डिसेंबर १९३० रोजी परदेशी मालाला विरोध करत त्यांनी मुंबईच्या काळबादेवी बाजारात कपड्यांनी भरलेले ट्रक अडवले होते. मात्र मालाचा एक ट्रक त्यांच्या अंगावरून गेला आणि त्यात ते चिरडले गेले. या घटनेत बाबू गेनू गंभीर जखमी झाले. त्यांना लगतच्या जीटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथेच उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यावेळी त्यांचे वय होते आवघे २२ वर्षे. ज्या रस्त्यावर बाबू गेनूंना परदेशी मालाने भरलेल्या ट्रकने चिरडले होते त्याला नंतर 'बाबू गेनू रस्ता' असे नाव देण्यात आले. १२ डिसेंबर १९३० रोजी या परिसरातली परिस्थिती एकदम वेगळी होती. बाबू गेनू शहीद झाले त्या ठिकाणी शहरातल्या शेकडो लोकांनी रांगा लावल्या होत्या. पुढचे दोन दिवस या रस्त्यावर बाबू गेनूंच्या रक्ताचे डाग स्पष्ट दिसत होते. बाबू गेनूंना श्रद्धांजली वाहत शहरातल्या नागरिकांनी या जागेवर पुष्पं वाहिली तर काहींनी अगरबत्ती लावली होती. परदेशी मालाचा निषेध करत नागरिकांनी शहराच्या विविध भागात कपड्यांची होळी केली होती. या घटने नंतर पुढचे काही दिवस मुंबईतील टाइम्स ऑफ इंडिया, नवाकाळ, बॉम्बे क्रॉनिकल, मुंबई समाचार या त्यावेळच्या नावाजलेल्या वर्तमानपत्रांनी वृत्तांकन केले होते. बाबू गेनूंचा मृत्यू कसा झाला. परदेशी कपड्यांचे व्यापारी या परिसरात ट्रक मध्ये माल भरत होते. त्यावेळी स्वदेशी आंदोलन जोरात सुरू होतं. त्यामुळे आंदोलनकर्त्यांचा त्रास होऊ नये म्हणून या इंग्रज व्यापाऱ्याने पोलिसांकडून सुरक्षा मागितली होती. दरम्यान परदेशी कपड्यांचे गठ्ठे भरलेला ट्रक या रस्त्यावरून जात असताना काही स्वदेशीच्या आंदोलन कर्ते ट्रकसमोर आडवे झाले. त्यात बाबू गेनू हेही होते. विठोबा धोंडू नावाचा एक भारतीय ट्रक चालवत होता. आंदोलनकर्त्यांच्या अंगावरून ट्रक नेण्यास त्याने नकार दिला. ट्रक मध्ये बसलेल्या एका ब्रिटीश सार्जंट त्यामुळे रागावला. त्याने ट्रकचा ताबा घेतला आणि थेट आंदोलनकर्त्यांच्या अंगावरून नेला. त्यातच बाबू गेनी शहीद झाले. या घटनेनंतर ब्रिटीश सरकारकडून जारी करण्यात आलेल्या अधिकृत खुलाशात म्हटले आहे की, ट्रक चालक जखमी झाल्यामुळे तो बेशुद्ध झाला. त्यानंतर ब्रिटीश सार्जंटने ट्रकचा ताबा घेतला. तोपर्यंत ट्रकवरचा त्याचा ताबा सुटला होता आणि तो आंदोलन कर्त्यांच्या अंगावर आदळला.
*संदर्भ : इंटरनेट*
संकलित लेख
No comments:
Post a Comment